Tuesday, August 25, 2026

शाळेतली ती पावसाची सर

सौंदर्याने तिच्या भाळलो मी पार 

तिच्यावरची नजर हटेल तर शप्पथ 

शाळा सुटली की तिचाच चेहरा 

जिथे तिथे डोळ्यासमोर तरायचा


पुन्हा कधी शाळेत जातो असे व्हायचे 

शाळेला सुट्टी आली की मन हिरमुसायचे 

जोरात पाऊस आला की मुले आनंदाने नाचायची 

पण मी मात्र खिन्न,कारण शाळेला सुट्टी मिळायची 


असाच एक दिवस... 

प्रार्थनेसाठी सगळी मुले मैदानावर 

भिजवून गेली साऱ्यांना पावसाची सर 

तिच्या केसातून ओघळणारं पाणी 

गालावरून घरंगळणारे ते जलथेंब


अहाहा! किती अलौकिक दृश्य होते  

माझं मन तेथे चिंबचिंब भिजून गेले होते

त्याच क्षणी तिची नजर माझ्यावर पडली 

ती लाजली.. मिश्किल हलकंसं हसली


त्या हसण्यात प्रेमाचा शहारा आला 

वाटलं हा क्षण इथेच थिजून जावा 

आमची नजर एकमेकांत गुंफून राहावी 

आणि पावसाची संततधार चालूच राहावी


शाळा सुटली... 

पण तो पाऊस आजही मनात पडतोय 

आणि ती... 

आजही तशीच डोळ्यात भिजतेय

तो पहिला पाऊस

शेवटी एकदाची केली हिम्मत

म्हटले किती दिवस ठेवायचे मन धजत

वर्षभर तिला डोळ्यात सामावून 

मनाला केले शांत समजावून 

धीर धर थोडे दिवस, मग घेऊ बघून


आली श्रावणाच्या पावसाची पहिली सर  

झाली हृदयात जमलेल्या प्रेमाची घर घर 

आसमंतात बहरला मातीचा सुगंध 

मनाने धैर्याने धुत्कारले सारे निर्बंध  


आज पहिल्या पावसाची होती साथ

समोरच होती ती घेऊन डोक्यावर छत्री 

धडाडले माझे हृदय, थरथर आली पायात 

तरी पावलं अनाहूत गेली छत्रीत तिच्याच 


माझी धजती अबोल नजर बोलून गेली 

पावसाच्या सरींनी गुपितं उलगडली 

जरी शब्द निघाले नाहीत ओठांवर,

तरी नजरेने सगळंच सांगून टाकलं 


तो पहिला पाऊस अजूनही आठवतो

आजही मनात तसाच रिमझिम बरसतो

ती न बोलता उमटलेली कबुली आणि 

छत्रीखाली रंगलेली ती  प्रेमाची कहाणी






Sunday, August 9, 2026

तर तू परत आला असतास का रे?

(काल घरी पाळलेला बोका जग सोडून गेला.... )

बोकू, एक दिवस अनाहूतपणे

तू आमच्या आयुष्यात आलास

एवढुसा, छोटासा निरागस जीव

आणि नकळत आमचाच झालास


तू लहान होतास तेव्हा दारातून

घरात घुसण्याचा हट्ट धारायचास  

ना ना करता, शेवटी तूच जिंकलास 

आणि घरातलाच होऊन राहिलास


आम्ही घरात चालताना सारखाच 

आमच्या पायात येऊन चालायचास 

आम्ही धडपडून पडायचा अवकाश 

पण तू मात्र निरागसपणे बघायचास


एकदम शांत, सुस्वभावी—

तुझं वर्णन तरी काय करावं?

ना हट्ट, ना आरडा-ओरडा

ना कधी कोणावर राग धरलास 


तुला हवं असलेलं काही

समोरून काढून घेतलं तरी,

एकही आवाज ना काढता 

ते शांतपणे सोडून द्यायचास 


त्या शेवटच्या क्षणी

मी तुझ्या डोळ्यांत डोळे घालून पाहत होतो

आणि अचानक तुझ्या डोळ्यातून दिसेनासा झालो 

तेव्हा हातातून तू अलगद निसटून गेलास ना रे


आयुष्यभर मला उल्हासित ठेवलंस

माझ्या चेहऱ्यावर हसू फुलवलंस

पण शेवटी मात्र जाता जाता माझ्या 

डोळ्यांत अश्रू देऊनच गेलास ना रे...


निराशेत एकच दिलासा, माझ्या डोळ्यात तरलेले 

अश्रू तुला नाही दिसले, ते अश्रू तुला नाही दिसले

पण जर ते अश्रू तू बघितले असतेस 

तर तू परत आला असतास का रे?